Showing posts with label गणपती महाराज व त्यांची अजात चळवळ. Show all posts
Showing posts with label गणपती महाराज व त्यांची अजात चळवळ. Show all posts

Saturday, January 26, 2013

गणपती महाराज व त्यांची अजात चळवळ

अजात
यंदाचा महाराष्ट्र टाइम्स दिवाळी अंक  वाचला.त्यातील गणपती महाराज व त्यांची अजात चळवळ हा लेख वाचून मी हादरलो. .अशा कितीतरी गोष्टी आपल्याला
माहिती नसतात.म.टा.चे आभार कि त्यांनी हि माहिती आपल्यापुढे आणली. त्या लेखाचा हा सारांश.- 

गणपती महाराज .१८८७ सालचा त्यांचा जन्म.मंगरुळ दस्तगीर हे त्याचं  गाव तिवसा तालुक्यात  आहे. राष्ट्रसंत तुकडोजी आणि गाडगे महाराज यांचे ते  समकालीन होते. ते माळी समाजाचे होते. ते वारकरी-कीर्तनकार होते. अजात.जाती सोडून द्या,आज पासून आपण अजात  अशी चळवळ त्यांनी विदर्भात १९२४  साली केली होती.बर्याच लोकांनी जाती सोडून दिल्या.जात लावयाची नाही,अजात म्हण्याचे स्वतःला. त्यात सर्वच जातीचे लोक होते  त्यांना ह्या कामात इतरांकडून त्रास हि झाला तसेच सहकार्य हि मिळाले.

 एकदा अजात झाला कि त्या व्यक्तीच्या घरावर  पांढर निशाण ते लावत.जात सोडली म्हणजे आपण स्वच झालो,स्वचतेच प्रतिक म्हणून पांढर निशाण त्यांनी स्वीकारलं होत.त्यांनी श्वेत  निशाणधारी अजातीय मानव संस्था निर्माण केली.  ते सामुदायिक काल्याचा कार्यक्रम करत.पिठल  भाकरी घर-घर फिरून एकत्र करायची,व गावाच्या मंदिरात सर्व समाजाने एकत्र येऊन  हा काल्याचा प्रसाद घ्याचा. म्हणजे कुणाच्या घरातली भाकरी कोणाला हे समजत नसे.अशा प्रकारे रोटी व्यवहार  त्यांनी सुरु केले.जे जात सोडून अजात
झाले अशांची लग्न त्यांनी आप आपसात लावून दिली.  नागपूरचे  महाराज  भोसल्यांनी हि त्यांचा रत्नजडीत पोशाख देऊन सन्मान केला होता. 

त्यांनी  ‘श्वेत निशाणधारी अजात मानव संस्था’ स्थापन करुन शेकडो अनुयायी
निर्माण केले. जातीचा विरोध, विषमतेचा विरोध सर्व पातळ्यापर्यंत पोहोचला पाहिजे. जात निसर्गाच्या विरोधी आहे. मानवाच्या आत्मस्वरुपाकडे जाण्याचा मार्ग जातीमुळे अवरुद्ध होतो, असे त्यांचे तत्त्वज्ञान होते.
आपल्या कीर्तन, प्रवचनातून सर्वांभूती समभावाने वागण्याची, निष्काम वृत्तीने ईश्वरभजन करण्याची, दारु-गांजा इत्यादी व्यसनापासून अलिप्त राहण्याचा आचारधर्म त्यांनी प्रतिपादन केला. त्यांनी 
त्याकाळी अस्पृश्यांसाठी मंदिर खुले करुन दिले. कोणतेही अवडंबर न माजविता कमी खर्चात विवाह करण्यावर भर दिला. आंतरजातीय विवाहावर त्यांनी दिलेला भर व  त्यासाठी त्यांनी केलेले विशेष प्रयत्न आजही प्रेरणादायी आहेत. 

अस्पृश्यांचा मंदिर प्रवेश, मिश्र विवाहाचे ग्रामीण भागात आयोजन, श्राद्ध, तेरवी अशा कर्मकांडाना जाहीर विरोध त्यांच्या विज्ञाननिष्ठ दृष्टीचे द्योतक आहे. 1987 साली विदर्भातील अनेक सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन गणपती महाराजांची जन्मशताब्दी साजरी केली. सव्वाशे वर्षांपूर्वी ग्रामीण भागातील जन्माला आलेल्या या सामाजिक व आर्थिक दृष्टीने अभावात जगणार्या संताने आपली क्रांतिकारी व जनमानसाला धडे देणारे विचार सामान्यांच्या गळी उतरविले व श्वेत  निशाणधारी अजातीय मानव संस्था निर्माण केली याचे आश्चर्य वाटते. 


त्यांनी हिंदू धर्मातील जातींचा नव्हे, तर हिंदू-मुस्लिम भेदाचाही धीटपणे विरोध केला. ज्योतिष, मुहूर्त, कर्मकांड यांना त्यांनी टाळले. एकनाथांनी काळानुरूप वेळोवेळी आपल्या वाणी व साहित्याद्वारे विरोध केला. त्यांनी विपुल अशी काव्यसंपदा निर्माण केली आहे. भारुड, भजने, भूपाळी, हरिपाठ यासोबत त्यांनी आपली सहजसिद्धानुभवर पूर्वार्ध व उत्तरार्ध अशा दोन खंडात आणि श्री पापलोप ग्रंथात खोट्या पांडित्याचा निषेध केला व आत्मस्वरुपाचे मर्म तार्किक पद्धतीने मांडले आहे. गुलाबराव नायगावकर यांच्या सत्यशोधकी
जलशाला, डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या शिक्षण प्रसाराला व तुकडोजी, गाडगेबाबांच्या समाजकल्याणार्थ त्यांनी प्रत्यक्ष कृतीद्वारे पाठिंबा दिला.या कामात सनातन्यांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्लेही केले. पण,
त्यांनी अंगीकृत कार्य सोडले नाही. गणपती महाराजांची काव्यसंपदा व चरित्र  जिज्ञासूंनी मुळातून वाचण्यासारखी आहे.

तसेच महाराष्ट्र जात निर्मुलन परिषदेचे ते अध्यक्ष होते. पण १९३४ साली त्याचं निधन झाल.त्यांच्या नंतरही त्यांच्या अनुयायांनी आंदोलन सुरूच ठेवलं. 


पुढे भारत स्वतंत्र झाला. स्वातंत्र्य मिळाले,मग जात आधारीत आरक्षण सुरु झाल. त्यात ह्या लोकांची नोंद "अजात" म्हणून झाली.ह्यांना कोणतेच आरक्षण मिळत नाही कि सवलती नाहीत.ह्या लोकांना दुख हे कि ज्या कारणासाठी आपण जात सोडली त्याची साधी दखल हि कुणी घेत नाही.हि चळवळ उपेक्षित राहिली. 

काही लोकांना आपल्या इतर भावांच्या जातीच्या  दाखल्या आधारे जात प्रमाणपत्र मिळाले.पण  जे जात सोडून अजात झाले त्यांच्याशी त्यांच्या नातेवाइकानी संबंध तोडलेच होते.   त्यामुळे बर्याच लोकना आरक्षणाचा  लाभ घेता येत नाही.  शिवाय बर्याच जाती ह्या मंडल आयोगामुळे आरक्षित झाल्या.हा आयोग लागू होता होता मध्ये ३ पिढ्या गेलेल्या.त्यामुळे इतकी जुनी प्रमाणपत्र ,कागपत्रे मिळणे  अशक्यच 

२००४ साली मुख्य  सचिव अशोक खोत ह्यांनी एक जनसुनावणी घेऊन अजातांच्या प्रश्नी तोडगा काढू असे आश्वासन दिले होते.त्यात समाजातील बर्याच व्यक्तीने आपले गाऱ्हाणे मांडले.पण पुढे काही झाले नाही.

जात सोडण्याची चळवळ,अजात होण्याची चळवळ जातीच्या रकान्यावर "अजात " म्हणून नोंद होऊन संपली.